आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, October 05, 2007

कोण मी?

विचारू कोणास आहे कोण मी?
सत्य की आभास, आहे कोण मी?

भविष्याला काय देऊ उत्तरें?
धुंडतो इतिहास, आहे कोण मी?

निरुत्तर तीही जिने सांभाळले
असे मज नवमास, आहे कोण मी?

निसर्गाने घात केला, जन्मलो
नवस ना सायास, आहे कोण मी?

जुगारी ना मी, न माता कैकयी
का तरी वनवास, आहे कोण मी?

नसे काही फायदा जाणून पण
तरी अट्टाहास, "आहे कोण मी"?

पुसे जाताना शरीरा सोडुनी
अखेरीचा श्वास, "आहे कोण मी"?

रिचव प्याले, प्रेम कर, बेधुंद हो
कशाला पत्रास,"आहे कोण मी"?

कशाला तत्त्वज्ञ, वेड्या, व्हायचे?
उमजले कोणास आहे, "कोण मी"?

'भृंग' तू गुंजारवाचे गीत गा
प्रश्न हा बकवास आहे, "कोण मी"?

कवी: ..........

वणवा

जोगवा मी वेदनेचा मागतो आहे
जीव पाषाणावरी मी लावतो आहे

होय, सर्वांशी जरी ती बोलते हसुनी
स्वर्ग सूताने तरीही गाठतो आहे

तीच फुंकर घालते अन्‍ तीच मग पुसते
"रात्रभर वणवा कशाने पेटतो आहे?"

वाहते निष्ठाफुले चरणी दुज्याच्या ती
अन्‍ उरी निर्माल्य मी कवटाळतो आहे

व्यसन दु:खाचे मला आहे असे जडले
भंगण्यासाठीच हृदया सांधतो आहे

काय त्या हृदयास जपणे ती जिथे नाही?
रिक्त गाभारा जणू सांभाळतो आहे

मार्ग जेव्हा वेगळे झालेत दोघांचे
पारिजाताचा सडा का सांडतो आहे?

कोरडे डोळे निरोपाच्या जरी वेळी
चेहऱ्याला मेघ पण आच्छादतो आहे

विखुरलेले स्वप्नमोती वेचुनी काही
आठवांच्या 'भृंग' माळा ओवतो आहे

कवी: ..........

गोळा-बेरीज

कोंडलेले सांगण्याला राहिले आयुष्य कोठे ?
काळजाला पिंजण्याला राहिले आयुष्य कोठे ?

सापडाया लागलो आता कुठे माझा मला मी
जीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे ?

वांझ शिक्षणशिंपल्य़ांची उपसली शालेय डबकी
मौक्तिकांना वेचण्याला राहिले आयुष्य कोठे ?

नाथ, नाम्या, माउली अन्‍ देहुचा नादार वाणी
शेष काही वाचण्याला राहिले आयुष्य कोठे ?

साधण्या संवाद पडला माणसांशी जन्म अपुरा
चिद्‍घनाशी बोलण्याला राहिले आयुष्य कोठे ?

कवी : ..........

गझल

नसतात पाहण्याचे, नसतात सांगण्याचे
हे घाव अंतरीचे असतात झेलण्याचे

खोली कशी कळावी सांगून कोरड्यांना
असतात प्रेमसागर हे आप पोहण्याचे

होऊ नकोस मुग्धा ऐकून गीत माझे
कविता निमित्त आहे संवाद साधण्याचे

जळणे कठीण नसते ज्योतीवरी, पतंगा
असतात प्रश्न अवघड नाते निभावण्याचे

नाते कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?
उरले न भान अंतर दोघात राखण्याचे

चुपचाप तेवणारी ज्योतीच दु:ख जाणे
दिनरात प्रियकरांना बाहूत जाळण्याचे

कवी: ..........

कैदी

देहाचे सोने झाले, देहाची माती झाली
कैद्यास तमा ना त्याची, त्याची तर मुक्ती झाली

जे उरले मागे त्याचे ना खंत तया ना खेद
अन्‌ तरी माणसे जमुनी का दु:खी-कष्टी झाली?

पाहे ना वळुनी मागे, ही फिकिर तयाला नाही
मागे उरल्या वसनांची कितवी आवृत्ती झाली

तो प्रवास करण्या निघता सोबत घेई ना कोणा
ती कशी रुचावी, ती तर कायिक आसक्ती झाली

योनींशी लाखो त्याचे संबंध निकटचे आले
गात्रांच्या संयोगाने त्याची ना तृप्ती झाली

संगमोत्सुकाची आहे वेडी आशा मोक्षाची
गुणहीन अरूपाशी ना अद्याप समष्टी झाली

कवी: ............

वस्त्र

मीच माझा धर्म आणिक
मीच आहे संप्रदाय
मीच प्रेषित, भक्त मी अन्‍
मीच आहे देवराय

क्षुद्र, कोता मी जिवाणू
मी घटोत्कच भीमकाय
कांबळी अन्‍ घोंगडी मी
अन्‍ कधी मी घट्ट टाय

कृष्ण काळा-सावळा मी
सांब शंकर गौरकाय
इंद्र मी लाचार याचक
वामनाचे मीच पाय

मर्द मी तो सव्यसाची
क्लीब किन्नर मीच नाची
मी युगांची साक्ष साऱ्या
मी खलांच्या लूटमाऱ्या

सोवळा मी, ओवळा मी
पक्व किंवा कोवळा मी
शोधतो गुंत्यात साऱ्या
कोणता आहे खरा मी

यातला मी एक धागा
एकरंगी, एकढंगी
गुंतुनी वा वस्त्र झालो
मर्त्य मानव सप्तरंगी ?

कवी: .................

वीट

भावनांच्या पुस्तकाला मागणीचा पेच येथे
देह चाळाया जनांची मात्र रस्सीखेच येथे

रोजचे संवाद आणिक रोजच्या अनिवार्य जखमा
शब्दठिकऱ्या नेहमीच्या, नेहमीची ठेच येथे

मी अगस्तीसम कधीचा क्षार पाणी पीत आहे
का तरीही डोळियांचे डोह भरलेलेच येथे?

यत्न मी आजन्म केला माणसांशी बोलण्याचा
मी तरी होतो मुका वा भोवती बहिरेच येथे!

मयसभा विद्वज्जनांची, काय त्यांचा रंग सांगू
कुंपणावर बैसलेले मान्यवर सरडेच येथे

फूल घे समजून त्यांना, हे तुझ्या आहे भल्याचे
जी मऊ दगडाहुनी ती वीट 'भृंगा' वेच येथे

कवी : ..................

Thursday, October 04, 2007

वि स खांडेकर


एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक

कवी : ..............
खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही
प्रेमाने तू जवळ करावं असं कधी वाटलं नाही

मनातील भाव क्षणभर थबकले
हृदयातील शब्द कागदावर ओघळले

तुझ्या प्रीतीचे कवडसे मनावर उमटले
तरी तुला भान हरपून पहावंसं वाटलं नाही

काजळ रात्रीतही प्रेम तुझे उजळले
माझ्या अंतरीच्या काठास स्पर्शून गेले

तुझे प्रेम माझ्या ओंजळीत भरलेले
तरी तुला ते हृदयात ओतावंसं वाटलं नाही

तरी याचा खेद नाही, खंत वाटली नाही
मी तुझ्यासाठी तडफडणं, याशिवाय आता काही उरलं नाही …

कवी : अद्न्यात

झिंगतो मी कळेना कशाला
जीवनाचा रिकामाच प्याला!

दूर झाले फुले वेचणारे
वेचतो मी फुलांतील ज्वाला

ही न वाणी तुझ्या वेदनेची
हा सुखाचा तुझ्या बोलबाला!

'काय झाले पुढे आसवांचे?'
हे विचारु नये सांत्वनाला

राहिलो दूर तू.. मी..तरीही
एक स्पर्शाविना स्पर्श झाला

गाव सारेच हे तोतयांचे
नाव माझे विचारु कुणाला?

काढली राञ जागून सारी
चंद्र माझा सकाळीच आला!

कवी : अद्न्यात

Wednesday, October 03, 2007

आज असा मला वर द्या.....

नाही माझ्याकडं सागरासारखं गहीरेपण
नाही माझं नदीसारखं निर्मळ दर्पण
या भवसागराचा तुमच्यासारखाच एक थेंब मी
आजन्म मला ईथ सुख-दुख:चा सौदागर होऊ द्या
प्रयत्न करुन मला यश-अपयशाच्या या सागरात पोहु द्या


ऊमलतोय लेखणीचा एक अनोखा गंध घेउन मी
नका लादु आत्ताच नियमांचा असा बंध तुम्ही
रोज नव्या रंगाची उधळण या रानात करायचीये मला
पण त्याआधी मला नीट तरी फ़ुलू द्या
शब्दसौंदर्याने नटलेल्या या जगात मलाही थोडं लिहु द्या


खुललेत आज माझ्यासाठी दार य़ा मोकळ्या नभाचे
फ़ुटलेत आजच पर मला नव्या दमाचे
नियमाच्या कात्रीने नका हो त्यांना असे कापु
एखाद्या नकोश्या फ़ांदीसारखा नका हो मला असे छाटू

व्हायचय या नीर तळ्याचा खळखळता आवाज मला
चढवायचाय या मनावर आत्मविश्वासाचा नवा साज मला
फ़क्त तुम्ही थोडा उत्साहाचा, विश्वासाचा स्वर मला द्या
"मिळो शिघ्र दर्शन मज विजयलक्ष्मीचे"
आज असा मला वर द्या.......आज असा मला वर द्या.....

--सचिन काकडे
रंग संगतीत तुझ्या शब्दसुरांची
उधळण ताला सूरात केली..
माझी या शब्दसुरांची माळ
तुझ्या कंठाभोवती ओवली...
सखे आज मी तुझ्यावरच कवीता लिहली..

तु सजवतेच मैफिल आनंदाची,
जेव्हा बिकट परिस्थिती माझ्या मनाची..
मग माझ्या ह्रिदयात उफाळून येते
उकळी त्या प्रीत गझलेच्या दुधाची...

कातरवेळीच्या त्या आठवणीची
झळ माझ्या काहूर माजत असते..
अन तु आपली माझ्याकडे येण्यासाठी
शुभ्र वस्त्र मर्मपरीचे नेसत असते..

मग चांदण्याची रात्र नवेली येते..
अन चंदेरी स्वप्नांची बरसात होते..
का अशी तू नेहमी उन सावलीच्या खेळात..
मला हरवून स्वत: हरल्याचा आभास देऊनी जाते..

कधी चिंब भिजवणारा ओला पाऊस ,
माझ्या मिठीत अनुभवतेस तर
कधी गुलाबी थंडीची ती
कामूक पहाट आणखी गुलाबी करतेस..

अशक्य आहे त्यावर तु तुझी किमया करतेस,
माझ्य प्रत्येक काट्यांच्या वाटेवर फुले उधळतेस..
का नेहमीच तु तुझ्या आकांक्षेला वेशीला टांगून
नेहमी माझ्या इच्छा आतुरतेने पुर्ण करतेस..

सखे मी पापांचा धनी,
अन तू निर्मळ हंसीनी..
किती फरक जमीन आसमानचा आपुल्यामधे..
तरीही तु लाजून म्हणतेस, "तुम्ही तर मालक माझे सरळ नी साधे"

काय म्हणाव या निस्वार्थ प्रेमाला,
का जोडावेत हाथ तुझ्याशिवाय त्या देवाला..
बस अशीच देवाच देवपण जपत माझ्याजवळ रहा..
अन या वाल्या कोळ्याला वाल्मिकी बनवत रहा...

---- आ.. आदित्य....

Monday, October 01, 2007

माझ्या मनाची व्यथा काय सांगू..?
आसवांत भिजली कथा काय सांगू..?

कळेना मला मी कुठे वाट चुकलो..
कुठे सोडला मी जथा काय सांगू..?

लाख सांगुनी जे तुलाही न कळले,
गूज या मनाचे वृथा काय सांगू..?

मिठीत घेऊनी जी तरूलाच गिळते..
किती ही विषारी लता काय सांगू..?

देह साजणीचा हा वेष काफिराचा,
फसलो पुरा मी आता काय सांगू..?

-- शीला
सोडुन मज जाशील जेव्हा वळुन मागे पाहू नकोस
गाव पेटेल माझा गावाच्या कोशीतही राहू नकोस

शब्दांच्या ओठी माझ्या गाणे उदास खुलतील
शब्दांसवे तेव्हा माझ्या तू गीत माझे गाऊ नकोस

ओढुन घे पदर अन नजर झुकव ही तुझी
मरणेही व्हावे मुश्कील मज इतुके तू भावू नकोस

जाशील मज सोडुन जेव्हा हरकत माझी नसेल
जाताना पण जगायला मज तू लावू नकोस

मी वेडा असा की सरणावरही श्वास घेइल
चेहरा तुझा अखेरीस मज तू दावू नकोस

झाले दु:ख जरी डोळ्यांआड लपव त्याला
चिता विझुन जाईल माझी अश्रु एकही वाहू नकोस

-- संदीप सुराले
तुझ्यासाठी मी रात्र रात्र जागणं
पण तुझ्या अश्या वागण्याने हा
रात्रीचा काळ आज मा़झ्यावर हसला
तुलाच जमलं नाही माझ्यासोबत जगणं
मग सखे आज असा तुझा हा
आळ माझ्या शब्दांवर कसला

तु जेव्हा-जेव्हा रागावलीस
तेव्हा तुझ्या हृदयाचा झोका
मी एकट्यानेच हजारदा ओढलाय
पण तुला समजवायला निघालो की
तुझा हट्टी तो स्वभाव नेहमीच
रस्त्यात मला बघ नडलाय

सांग ना सखे असा कसा
गं तुझा हट्टी स्वभाव
ना त्यात कुठला भाव,
ना त्यास कुठला गाव

खरचं वैतागलोय आता
तुला सारखं-सारखं समजाऊन
मनं माझं म्हणतय
"आता तु ही पाह रे
जरासा तिच्यावर रागावुन" ?

एक सांगु सखे , माझं वेळ साक्षी आहे
आजवर माझ्यावर बोट उचलणारा हात
दरवेळी स्वतःहुनच मोडलाय

माझ्या मनाच्या सांगण्यावरुनच तुला समजवणारा प्रत्येक शब्द
आता मी काळजावरुन खोडलाय
पण आता जे होईल ते होईलआता आपल्या नात्याचा निकाल
मी तु़झ्या उत्तरावर सोडलाय......

भासतं मला आज जणु हा सांजगारवा मनात
माझ्या "फक्त तुझ्यासाठीच" दडलाय
वाटतं मला सखे आज
की जीव माझा तुझ्यावर जडलाय....
हा जीव वेडा तुझ्यावर जडलाय....

--फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"
--सचिन काकडे
गालावरी खळी डोळ्यात धुंदि
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका ईशा-याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

कोणताहा मौसम मस्त रंगाचा
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धूंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाहि मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली
मला जिंदगीही घेऊनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची मज आता येई मजा
तू माझे जिवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे