आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, December 22, 2009

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांची जन्मदाती आई ही जिजाबाईसाहेबांची ओळख.पण त्यांची एव्हढीच ओळख करुन देणे हा त्यांच्यावर अन्याय होईल.देवगिरीचे सम्राट यादवराव हे भगवान श्रीकृष्णाचे वंशज.या यादवरावांच्या घराण्यामधील लखुजीराजे जाधवराव यांच्या खानदानी घराण्यात सन १५९८ मध्ये जिजाबाईसाहेबांचा जन्म सिंदखेडराजा येथे झाला.लखुजीराजे जाधवराव हे त्याकाळी निजामशाह दरबारामधील एक कर्तृत्ववान,मातब्बर सरदार !घरी गजांतलक्ष्मी नांदत होती.अशा ऐश्वर्यसंपन्न घराण्यात जन्मलेल्या जिजाबाईसाहेबांचे लग्न तितक्याच तोलामोलाच्या भोसले घराण्यामधील शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाले.भोसले हे मातब्बर,कर्तबगार,पराक्रमी सरदारहि निजामशहीच्याच पदरी चाकरी करीत होते. एका ऐश्वर्यसंपन्न खानदानी घराण्यातील मुलीने लग्नानंतर दुस~या ऐश्वर्यसंपन्न घराण्यातील खानदानी घराण्यात प्रवेश केला.शहाजीराजांबरोबर लग्न म्हणजे एका कर्तबगार,शुर,धाडसी...प्रसंगी धोका पत्करण्याची तयारी असलेल्या महत्वाकांशी विर पुरुषाला जीवनभर साथ देण्याचे व्रत!पौर्णिमेसारखे सुख,आनंद उपभोगणे व अमावस्येसारखे दुखःही भोगणे !नखशिखांत सौभाग्यलेणी ल्यालेल्या,वज्रचुडे घातलेल्या जिजाऊसाहेबांचे सौभाग्य सदैव पणाला लागलेले !वडील,भाऊ यांचे निजामशहाने भर दरबारामध्ये दगाबाजीने केलेले खून,पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविणे,सख्ख्या जाऊबाईंना मोंगल सुभेदाराने पळवून नेणे,शहाजीराजांचे अपमान हे सर्व त्यांनी भोगले.शहाजीराजांना निजामशाहीच्या नांवाखाली स्वतंत्र राज्य स्थापण्याला यश आले नाही व अदिलशाहाने त्यांना नवीन,मोठी जहागिरी देउन बंगरुळला पाठविले.भरपूर दागिने लेऊन,भरजारी रेशमी वस्त्रे घालुन,चांगले गोडधोड खाउन शहाजीराजांसोबत बंगरुळात ऐश्वर्यात जिवन जगणे त्यांना सहज शक्य होते.पण त्यांचा पिंडच वेगळा होता.महाराष्ट्रामध्ये मुसलमान बादशहांनी हिंदूंवर चालविलेले जुलूम,स्त्रियांवरील अत्याचार यामुळे त्या अस्वस्थ,बेचैन होत्या.रंजल्या गांजल्या सामान्य माणसाला या त्रासामधून सोडविण्यासाठी आपले राज्य,स्वराज्य हवे या विचाराने भारलेल्या जिजाऊसाहेबांनी सुखाने आनंदाने बंगरुळला शहाजीराजांसोबत रहायचे सोडून पुण्याच्या फक्त ३६ खेड्यांच्या जगागिरीमधून "स्वराज्य" निर्माण करण्याचे वेडे व्रत स्वीकारले.

 

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब-2

आदिलशाही सरदारांनी पुणे व आजूबाजजूचा शहाजीराजांच्या जहागिरीचा प्रदेश बेचिराख केला होता.अशा उध्वस्त,उजाड जहागिरीमधून हिंदवी स्वराज्य उभे करण्याचा त्यांनी निश्चय केला.पतीच्या स्वराज्याच्या ध्यासाचे त्यांना सदैव भान होते.पुण्याच्या ३६ खेड्यांच्या उजाड जहागिरीच्या को~ या कागदावर त्यांनी स्वराज्य-मंदिर रेखाटण्यास सुरुवात केली.त्याकेवळ बाल शिवाजीराजांच्याच आऊसाहेब नव्हत्या.....त्यातर अवघ्या मावळातल्या स्वराज्यातल्या सर्व गोरगरीब सामान्य रयतेच्याच माऊली अन सावली झाल्या.रंजल्या-गांजल्या सर्वसामन्य रयतेच्या,साध्या सैनिक-शिलेदारांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी आऊसाहेबांचा आधाराचा हात सदैव सर्वांच्या पाठीवर असायचा.
जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व सतराव्या शतकात पुर्ण हिंदुस्थानामध्ये ठळकपणे उठुन दिसत होते. मुत्सद्दी,धडाडी,कणखरपणा,धैर्य या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अंधा~या आकाशात ठळकपणे तळपण्या~या धृव ता~या प्रमाणे मार्गदर्शक होते.त्यांचे निपक्षपाती न्यायदान,कर्तव्यकठोर स्वभाव,प्रजेबद्दलचे ममत्व,हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा,स्त्रियांच्या बेअब्रुची चिड यासर्वांचा परिणाम बाल शिवाजी राजांच्या जडणघडणीवर फार मोठा आहे.आऊसाहेबांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या नंतरचे चार पुत्र अल्प वयातच मृत्यू पावले.पुढे शंभुराजेहि कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले.आता राहिले एकटे शिवाजी महाराज ! मात्र शिवाजी महाराजांवर आलेल्या अनेक संकटप्रसंगी त्या विचलीत झाल्या नाहीत.अफझलखानाला,आग्रा भेटीला जाण्याचा प्रसंग असो,आऊसाहेबांचा सल्ला असायचा..." सिऊबा बुद्धीने काम करणे,अफझलखानास मारोनी संभाजीचे ऊसने घेणे" "सिऊबा जाणे,राजकरण फते करुन येणे."कर्तव्यकठोर,न्यायनिष्ठू
र,प्रजावात्सल्य,शूर,प्रशासनकुशल अन मुत्सद्दी राजा घडविण्यासाठी जे जे आवश्यक आहे,ते ते त्यांनी केले.म्हणुनच शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना त्यामधून जिजाऊसाहेबांना वगळताच येणार नाही.
"राधा माधव विलास चंपू"या काव्यात्मक ग्रंथामध्ये जयराम पिंडे या समकालीन कवींनी जिजाऊसाहेबांचे वर्णन कसे केले आहे पहा...........
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई !
भली शोभली ज्यास जाया जिजाई !!
जिचे किर्तीचा चंबु जंबुद्विपाला !
करी सावली माऊलीशी मुलाला !!
एके ठिकाणी जयराम पिंडे त्यांचा उल्लेख "योगिनी" असेहि करतात.

 

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब.-3

जिजाबाईसाहेबांच्या कर्तृत्वाचे मुल्यमापन करताना डॉ.बाळकृष्ण म्हणतात......
she had the head of a man over the shoulders of a women.she remained a guide,philosopher and friend to shivaji through out her life.she anxiously watched the rising sun of the glory of her son and was fortunate to witness it's climax in his coronation as an independent king and an ornament of kshatriya race.
(जिजाबाईसाहेबांचे शरीर स्त्रीचे पण डोके(मुत्सद्दीपणा,बुद्धिमत्ता) मात्र पुरुषाचे होते.आपल्या सर्व आयुष्य़ामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक,तत्वज्ञ व ख~या मित्राप्रमाणेच राहिल्या.अतिशय उत्सुकतेने त्यांनी आपल्या मुलाचे सुर्याप्रमाणे दैदिप्यमन्य हिंदवी स्वराज्याचे वैभव पाहिले,आणि क्षत्रिय कुलामधील सार्वभौम सिंहासनाधिष्ठ हिंदू राज्याच्या रुपात आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा माध्यान्हहि पहाण्याचे भाग्य त्यांना त्यांच्या आयुष्यातच लाभले.)
राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसानंतर बुधवार दि.१७/०६/१६७४,जेष्ठ वद्य नवमी शके १५९६ रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचा मृत्यू झाला.महाराजांचा राज्याभिषेक पहाण्यासाठीच जणू त्यांनी आपले पंचप्राण आपल्या वृद्ध,थकलेल्या शरिरामध्ये एकवटले होते अन आपल्या मुलाचा हिंदू नृपति म्हणून सिंहासनाधिष्ठित झालेला पाहून कृतार्थतेने त्यांनी शांतपणे,समाधानाने कैलासाची वाट धरली.त्यांचा मृत्यू नवज्वराने झाला असे शिवदिग्विजय बखरीमध्ये स्पष्ट लिहिले आहे.
जिजाऊमाँसाहेब म्हणजे महाराजांचे सर्वस्वच !त्यांच्या मृत्यूने महाराज अतीव शोकाकुल जहाले.महाराजांच्या शोकाकुल मनःस्थितीचे अतिशय ह्रुद्य वर्णन शिवदिग्विजय बखरीमध्ये उपलब्ध आहे........
"(महाराजांनी)आईसाहेबांचा आज्ञाभंग तिळमात्र केला नाही.......परस्परे एकाग्र अंतःकरणे होती.त्यामुळे क्षणैक वियोग जाला असता मनास चैन पडू नये,जावे,भेटावे असे (महाराज)वागत होते.ते छत्र (मातृछत्र)विच्छिन्न जाल्यामुळे उदासवृत्तीने......बहुतेकांनी नानाप्रकारे रंजने केली,परंतु कधी संतोष पहिल्याप्रमाणे जाला हे घडलेच नाही."
पुण्यशील,योगिनी जिजाबाई आईसाहेबांना लाख लाख प्रणाम .

सुभाष खडकबाण .

स्त्रोत : विरोप

Friday, December 18, 2009

सार्थ हिंदु नृसिंहा...........

सावरकरांची एक कविता आणि तिचा अर्थ...

हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री - सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

=========================

हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा

:- हे हिंदु शक्तिद्वारा उत्पन्न झालेल्या धगधगीत तेजस्वी पुरूषा !

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

:- हे हिंदुंनी अविरत केलेल्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्वराच्या तेजस्वी अंशा !

हे हिंदुश्री - सौभाग्य-भूतिच्या साजा

:- हे हिंदुंच्या लक्ष्मी व सौभाग्य ऐश्वर्याच्या अलंकारा !

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा !

:- हे हिंदुंसाठी कलियुगात अवतार धारण करणार्‍या नरसिंहरूप शिवराया !

(ज्या प्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपू राक्षसाला फाडले त्याच प्रमाणे शिवरायांनी अफजल खान रूपी राक्षसाला फाडले हा एक अर्थ आणि सिंहा समान शूर असणारा राजा म्हणून नरसिंह असाही एक अर्थ)
 
करि हिंदुराष्ट्र हें तूतें ! वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

===================================

करि हिंदुराष्ट्र हें तूतें ! वंदना

:- हे हिंदुराष्ट्र तुजला वंदन करीत आहे.

करि अंतःकरण तुज अभि-नंदना

:- (हे हिंदुराष्ट्र) तुझी अंतःकरणापासून भलावण करीत आहे.


तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना

:-(हे हिंदुराष्ट्र) तुझ्या पावलांना भक्तिभावाने चंदन लेपत आहे.

गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, माझ्या काही अत्यंत गुप्त अशा महत्वाकांक्षा आहेत, त्या तुम्ही पूर्ण करा. त्या गुप्त महत्वाकांक्षा पूर्ण करा, ज्या मी प्रगटपणे (पारतंत्र्यात असल्यामुळे) कथन करू शकत नाही.
 
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदुर्ग आंसवामाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे ! भंगले
जाहली राजधान्यांची ! जंगले
परदास्य-पराभवि सारीं ! मंगले
या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

==========================

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

:- गड कोटांचे तट आज भग्नावस्थेस पोहचलेले आहेत.

हा भग्न आज जयदुर्ग आंसवामाजी

:- एके काळी विजयोत्सव साजरे करणारे दुर्ग आज आश्रू ढांळत आहेत.

ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा

:- एकेकाळी प्रतक्ष भवानी देवी ज्या तरवारींमध्ये संचार करीत होती, त्या तरवारींची पाती आता (अहिंसा व्रताचरणाने) न वापरली गेल्या मुळे गंजून गेलेली आहेत.

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

:-आमच्या शस्त्रांस्त्रांची आम्हीच आशी आबाळ केल्यामुळे, एके काळी
आमच्या शस्त्रांमध्ये वास्तव्य करणारी ही भवानी आज कुणाला आधार देईनाशी झाली आहे.

गड कोट जंजिरे सारे ! भंगले

:-गिरीदुर्ग आणि जलदुर्ग आज पूर्णपणे भंगलेले आहेत. (आमचा इतिहास आम्ही पूर्ण विसरून गेलो आहोत व आमच्या स्फुर्तीस्थानांना आज अवकळा प्राप्त झालेली आहे.)

जाहली राजधान्यांची ! जंगले

:- एके काळी सप्त गंगांच्या साक्षीने जिथे राज्याभिषेक झाले, अशा आमच्या राजधान्यांची आज जंगले झालेली आहेत. (आम्ही एके काळी 'पृथ्वी वल्लभ' होतो हेच मुळात आम्ही विसरून गेलेलो आहोत.)

परदास्य-पराभवि सारीं ! मंगले

:- पारतंत्र्यात जगताण्यात व पराभूत जिणे जगण्यातच आज आम्ही धन्यता मानीत आहोत.

या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, हे असले लाजीरवाणे जीवन कंठावे लागत असल्यामुळे या जगात जगतांना लाज वाटत आहे.
 
जी शुद्धी हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धी पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कुटनीतीत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतुचि कर्मी ! राहु दे
ती बुद्धी भाबड्या जींवा ! लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी ! वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

===============================

जी शुद्धी हृदाची रामदासशिर डुलवी

:- (तुझे) निर्मळ व शुद्ध अंतःकरण असे आहे की जे पाहून प्रत्यक्ष रामदास स्वामींनी अत्यानंदाने मान डोलवली.

जी बुद्धी पांच शाहींस शत्रुच्या झुलवी

:- (तुझी) अफलातुन बुद्धी अशी होती की जीने पांच पातशाह्यांना पराभवाच्या तारेवर झुलवत ठेवले.

जी युक्ति कुटनीतीत खलांसी बुडवी

:- (तुझी) युक्ति कुटनितीत (श्रीकृष्ण व चाणक्याने दाखवून दिलेली निती) इतकी प्रगल्भ होती की जीने कित्येक दुष्ट शत्रुंना रसातळाला पोहोचवले.

जी शक्ति बलोन्मत्तास पदतली तुडवी

:- (तुझी) शक्ति अशी अफाट होती की जीने बळाने उन्मत्त झालेल्या कित्येक राक्षसांना पायदळी चिरडून टाकले.

ती शुद्धी हेतुचि कर्मी ! राहु दे

:-आम्ही आमची कर्मे करीत असताना व हेतू साध्यता करीत असताना, ते तुझ्या सारखे निर्मळ व शुद्ध अंत:करण आमचेही राहू देत. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

ती बुद्धी भाबड्या जींवा ! लाहु दे

:- पांच पातशाह्यांना झुलवत ठेवणारी ती अफाट बुद्धीमत्ता या परम सहिष्णू भाबड्या हिंदुंनाही जरा लाभु देत. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

ती शक्ती शोणितामाजी ! वाहु दे

:-बळाने उन्मत्त झालेल्या राक्षसांना पायतळी तुडवणारी तुझी ती शक्ति आम्हालाही रणांगणात युद्ध करताना अंगात संचारू देत व त्या शक्तीने शत्रुच्या चिंधड्या उडवताना आम्हांस रक्तस्नान घडू देत.

दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, समर्थ रामदास स्वामींनी तुला जो स्वातंत्र्याचा मंत्र दिलेला होता तो तू पुन्हा आमच्यात संक्रमीत कर. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

कवी - स्वातंत्र्यवीर सावरकर
स्त्रोत : विरोप

Thursday, December 17, 2009

मराठी भाषेची ताकद

मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे


परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.


पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.


पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.


पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.


पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.


पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.


पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.


पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.


पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.


पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.


स्त्रोत: विरोप
लेखक : शंतनू भट

Friday, November 27, 2009

हसा आणि लठ्ठ व्हा

एका वाड्यात एक नवे जोडपे आले, जोशी काका ऑफिस ला निघताना जोशी काकू रोज म्हणायच्या -" काहो ! पेरू चा पापा घेतला ना ?

पहिले वाड्यातला बायका हसायला लागल्या,मग चिडायला लागल्या.

एक दिवस त्यांनी वैतागून काकू ला म्हटले -" अहो एवढा रसिकपणा ठीक नाही, आमच्या मुला आणि नवर्यांवर वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता फाजीलपणा करायला लागले आहे. हे सर्व बंद करा आता.

काकू: मी काय रसिकपणा केला ?

वाड्यातला बायका: अहो " पेरू चा पापा घेतला ना " याचा अर्थ काय तो आम्हाला काय समझत नाही का?

काकू: त्यात काय गैर आहे?

वाड्यातला बायका: इश्श ! तुम्हीच सांगा मग याचा अर्थ काय तो !!!

काकू: " पेन,रुमाल,चाव्या,पाकीट,पास घेतेला ना ?

काकू नी निमुटपणे उत्तर दिले.

Tuesday, November 17, 2009

असं म्हणतात.


सांग असं अर्ध्यावर कुणी तोडतं का नात
पडला ना जो कमी काही त्यास विश्वास म्हणतात.

तुला एकदाही न वाटले विचारावा खड्सून जाब
मग मी केलेना जे प्रेम त्यास माझी व्ययक्तीक बाब म्हणतात.

तुला वाटलेच कधी हसावे तर हास तुझ्यासारखेच गोड
माझ्यासारख्याचे जे होते त्यास घायाळ म्हणतात.

तुला हवा होता देव पूजावया खास
चुकतो ना जो माझ्यासारखा कुणी त्यास माणूस म्हणतात.

आता तुही बसतेस डोके खुपसून मांडीमध्ये 
पाझरतो ना जो कुणी डोळ्यातून त्यास पश्चाताप म्हणतात.

मी नसल्यावरही होतो माझा असल्याचा भास तुला 
कावरी बावरी होतेस ना सारखी त्यास विरह म्हणतात.

आता धावत ये घडल्या प्रसंगाची ना मानता भीती 
समावशील ना अवघी ज्यात त्यास मिठी म्हणतात.


कवी : -- अमोल राणे 

स्त्रोत: विरोप 



Friday, November 13, 2009

असेही जगून बघा........


माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!

"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..


कवी : अद्न्यात 
स्त्रोत: विरोप


Tuesday, November 10, 2009

खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

एका छोटीचे मनोगत..

कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??

बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
सांग आता यात माझं असं काय चुकलं..??
रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला..
दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..
कलतंच नाही मला नेमकं काय झालं.
खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??

- प्राजु

राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती
हसू येते मला, पाहून तुझ्या करामती

ललू नको बघ तुझे नाक झाले लाल
हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल

हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ
संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ

फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल
बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल

माललं त मालू दे, आई आहेच वेडी
हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी

-- (खोडकर) अनामिक


कविता : आज का गं सजनी

आज का गं सजनी,
तुझ्याविना अंगणी,
तुळस हि मनोमनी गहिवरली.
तुझ्या हाती नाही दिवा,
सांजवेळी पूजावया,
उगवून चंद्रकोर मावळली.

कातरवेळेचा प्रकाश,
पडला नाही काही खास,
मिलनाचा सदा कोणी विस्कटला.
तुझी माझी नवी प्रीत,
विरहाचे नवे गीत,
गाण्यासाठी पावा देखील सावरला.

तुझ्या किती आठवणी,
एक एक जीवघेणी,
आज तुझी जाड वेणी आठवतो.
तुझी माझी कहाणी,
अर्ध्यातच विराणी,
डोळ्यामध्ये किती पाणी साठवतो.

भेटतील नवे सूर,
भेटतील नवे शब्द,
भेटीतले नवे गीत गातील,
सापडेल नवी लय,
संपेल गं सारे भयं,
विरहाचे दिस जेव्हा जातील.

-- अमोल राणे.