आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, September 30, 2009

विनोदी विनोद

एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला.
समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ''एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस.''
त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, ''पण मला मिशा नाहीयेत.''
त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला, ''पण माझ्या बायकोला आहेत ना.''

************************************************************************************************************************************
सुपे गुरुजी : गण्या, थांब तुझ्या पालकांनाच बोलावून लावतो कसा. अभ्यासात शून्य आणि मी इतका जीव तोडून शिकवतोय तर तुझं सगळं लक्ष खिडकीबाहेर.
हे काय चालायचं नाही. तुझ्यासारख्या मुलांच्या ठायी शिक्षक काय सांगतायत ते नम्रपणे ऐकून घ्यायची वृत्ती, शिकून घेण्याची आस असायला हवी. काय समजलास?
गण्या : माफ करा गुरुजी.
सुपे गुरुजी : अरे शिंचा, मी ओरडतो ते तुमच्या भल्यासाठीच ना? कायम लक्षात ठेव, 'विद्या विनयेन शोभते,' काय समजलास?
गण्या : समजलं गुरुजी!
सुपे गुरुजी : मला सांग बघू तू या शिक्षण संस्थेत कशासाठी येतोस बरं?
गण्या : विद्येसाठीच की!
सुपे गुरुजी : शाब्बास. मग मी शिकवत असताना बाहेर का बरं बघत होतास तू?
गण्या : गुरुजी विद्या अजून आली नाहीय शाळेत ना. म्हणून तिचीच वाट बघत होतो.
************************************************************************************************************************************
संता बस स्टॉपवर उभा होता. एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, ''तुम्हाला लिफ्ट हवी आहे का?''
संता म्हणाला, ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!!!!''
************************************************************************************************************************************
चार मुंग्या पोहत असतात.
तीन जणी नीट पोहत असतात.
एक मुंगी मात्र हात वर करून पोहत असते.
का?
कारण तिचं घड्याळ वॉटरप्रूफ नसतं!!!!!
************************************************************************************************************************************
१९७५ साली बंगलोर-म्हैसूर रस्त्यावरच्या एका डोंगराजवळ तीन पक्षी उडत चालले होते...
अचानक ते रक्तबंबाळ होऊन कोसळले...
का?
अरे आठवा...
गब्बरसिंगने 'तीनो बच गये' म्हणत हवेत तीन गोळ्या नव्हत्या का झाडल्या?!!!!!
************************************************************************************************************************************
दोन झुरळे आयसीसीयूमध्ये अॅडमिट होती.
पहिल्या झुरळाने दुस-याला मोठ्या कष्टाने विचारले, ''काय खाल्लेस? बेगॉन स्प्रे?''
दुसरे त्याहून कष्टाने उत्तरले, ''नाही... चप्पल!!!!!''
************************************************************************************************************************************
बन्या शेवटी एकदाचा अमेकिकेच्या टूरवरून परत आला.
आल्या आल्या स्वत:ला आरशात न्याहाळत त्यांनी बायकोला विचारलं, काय गं, मी फॉरेनरसारखा दिसतोय का?
बनी भातखंडे : छे बुवा!
बन्या : अरे? असं कसं? मला तर तिथे रस्त्यात दोघा चौघा अमेरिकन माणसांनी थांबवून विचारलं की, आर यू फॉरेनर?
************************************************************************************************************************************
बसमध्ये तुडुंब गर्दी होती. विन्या प्रधान एका सीटवर बाहेरच्या बाजूला चेमटून बसला होता.
त्याच्याशेजारी सत्तरीच्या घरातली फ्रेनीआजी उभी होती. तिने विन्याच्या खांद्यावर टकटक केले, तेव्हा विन्याला झोपेचे नाटक सोडून तिच्याकडे पाहावेच लागले.
तिने त्याच्या हातात चार बदाम ठेवले आणि म्हणाली, ''खा बाळा, खा!'' विन्याने चवीचवीने बदाम खाल्ले आणि पुन्हा त्याचा 'डोळा लागला'.
पुन्हा खांद्यावर टकटक झाल्यावरच तो उघडला.
फ्रेनीआजीने पुन्हा त्याच्या हातात चार बदाम ठेवले आणि म्हणाली, ''खा बाळा, खा! तब्येतीला चांगले असतात बदाम.'' विन्याने पुन्हा बदाम मटकावले.
असं आणखी दोनदा झाल्यावर विन्या म्हणाला, ''अहो आजी, असे बदाम वाटत का फिरताय? तुम्ही का नाही खात ते?''
तोंडाचं बोळकं रूंदावत फ्रेनीआजी म्हणाली, ''दात पडले माझे सगळे बाळा! चावणार कशी बदाम?''
'' अहो पण तुम्ही खाऊ शकत नसताना महागडे बदाम विकत घेता कशाला?''
हातातला बदामाच्या चॉकलेटांचा पुडा नाचवत आजी निरागसपणे म्हणाली, ''त्यांच्याभोवतीचं चॉकलेट तर चघळता येतंच ना मला!!!!!!!''

Cheers,

An@nd K@le
सुखं वा यदि दुःखं, प्रियं वा यदि अप्रियं
प्राप्तं प्राप्तं उपासिते. हृदयेन अपरजितः

Thursday, September 24, 2009

टिपा टिप्स!


भिंतीवर खिळा मारताना जर भिंत फुटत असेल तर खिळ्यावर राग काढण्याऐवजी हातोडीने सरळ भिंतीवरच ठोकावे. खिळा मारण्याचे श्रम वाचतात आणि रागही निवळतो.

निळ्या शाईचा डाग पांढऱ्या कपडय़ावर पडल्यास, त्याच्याच बाजूला लाल शाईचा डाग पाडावा. कोणता डाग अगोदर पुसला जाईल याची चाचणी घ्यावी. वेळ मजेत जातो.

घरातील बाथरूमच्या जाळीतून उग्र दर्प येत असल्यास, घराबाहेर पडून रस्त्यालगतच्या एखाद्या गटाराला भेट द्यावी. घरातल्या वासाचा त्रास सहन करण्याची शक्ती वाढते.

वजन कमी करण्यासाठी घरातच जोरजोरात उडय़ा माराव्यात. साहजिकच खालच्या मजल्यावरील रहिवासी भांडायला येतात आणि त्यात प्रचंड कॅलरीज खर्च होतात.

रस्त्यातून चालताना एक चप्पल तुटली तर दुसऱ्या पायातली चप्पलही तशीच तोडावी, फॅशन बनते.

पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय म्हणजे काळा गॉगल लावून आरशात पाहावे.

चौकात वाहतूक पोलीस दिसला नाही तरी गाडी शिस्तीत सिग्नलला थांबवावी. तो खात्रीने पुढच्या आडोशाला लपलेला असतो.

तोंडाला दारूचा वास येत असल्यास साधा उपाय म्हणजे तोंड बंद ठेवावे.

वरण-भात जास्त झाल्यास तो आघाडीच्या नटय़ांपर्यंत पोहोचवण्याची सोय करावी. या सर्व नटय़ांची वरण-भात ही आवडती डिश असते.

वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्यास, वीज मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू नये. तेथील अधिकारीही अंधारात असू शकतात.

दाढदुखी थांबविण्यासाठी स्वत:च्या कानाखाली जोरात मारून घ्यावे. गाल बधिर होऊन दाढेचे दुखणे सुसह्य़ होते.
ताजी टीप : वरील उपाय स्वत:च्या जोखमीवर करून पाहावेत.

--राज चिंचणकर, माहीम, मुंबई.

स्त्रोत: विरोप

Wednesday, September 23, 2009

मिरवणूक


नगर शहरात नवी पेठ विभागात नवीन मराठी शाळा या नावाची एक शाळा आहे. अलीकडच्या काळात बहुधा या शाळेचे नाव बदललेले आहे. साधारणतः सन १९५४ ची घटना आहे. याच शाळेत घडलेली.

इयत्ता पहिलीच्या वर्गावर नगर शहरातल्या ट्रेनिंग कॉलेजमधील एका विद्यार्थी-शिक्षकाचा एक पाठ चालू झाला होता. बहुधा इतिहासाचा किंवा परिपाठाचा तास असावा. त्याकाळी परिपाठाच्या विषयात पौराणिक कथांचा अंतर्भाव पहिल्या दुसऱ्या इयत्तेसाठी केला जात असावा. रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र, पत्नी सीता, बंधू लक्ष्मण व परमभक्त हनुमानासह प्रवेश करताहेत आणि मिरवणुकीने त्यांचे स्वागत अयोध्या नगरीतील जनता हर्षोत्फुल्ल वातावरणात करत आहे हा पाठाचा विषय होता.

पाठाचाच एक भाग म्हणून पूर्वज्ञानावर आधारित असा सर्व मुलांना उद्देशून एक प्रश्‍न शिक्षकांनी विचारला-

""तुमच्यापैकी मिरवणूक कोणी पाहिली आहे?''

क्षणभर वर्गात शांतता पसरली. मग काही जणांचे हात वर झाले. तेव्हा एका विद्यार्थ्यास शिक्षकाने विचारले, ""तू सांग बघू, तू कोणती मिरवणूक बघितलीस?'' तो मुलगा म्हणाला, ""मी लग्नाची मिरवणूक बघितली.''

शिक्षकाचा आनंद आणि उत्साह दुणावला. कारण त्यांना अपेक्षित असे उत्तर मिळाले होते. वस्तुतः त्या शिक्षकाने इथेच पाठाचा धागा पकडून मुलांना आपल्या मुख्य पाठ्य भागाकडे नेण्यास हरकत नव्हती. पण त्यांनी उत्साहाच्या भरात एक अनावश्‍यक प्रश्‍न त्या मुलाला विचारला-

""अरे वा! पण कुणाच्या लग्नाची मिरवणूक तू बघितलीस?''

त्या मुलाने उत्तर दिले, ""माझ्या वडिलांच्या लग्नाची.'' आणि वर्गात एकच हशा पिकला.

मुलाचा चेहरा निरागस होता. त्यात बनेलपणाची छटा नव्हती. ते एक प्रामाणिक उत्तर होते. पण त्या उत्तरामुळे उसळलेल्या हशात ते नवखे शिक्षक गोंधळून गेले. काय करावे त्यांनाही सुचेना. पाठ भरकटून चालणार नव्हते. पण त्या शिक्षकाने स्वतःला सावरले.

""बरं, बरं, बस खाली...' असं त्या मुलाला म्हणून शिक्षकांनी आपला पाठ सुरू केला आणि त्या मुलाकडे अधूनमधून विचित्र दृष्टिक्षेप टाकत, कपाळावरचा घाम पुसत त्यांनी आपला पाठ कसाबसा संपवला.

पाठ संपल्यावर पाठाचे निरीक्षण करणारे त्या शिक्षकांचे मेथड मास्तर त्यांना म्हणाले-

""सर, तुमचा पाठ चांगला झाला; पण सुरवातीला तुम्ही त्या मुलाला विचारलेला प्रश्‍न अनावश्‍यक होता. त्याच्या उत्तरामुळे तुम्ही गडबडलात.

तेव्हा ते शिक्षक म्हणाले, ""मान्य आहे सर, पण त्या मुलाने दिलेले उत्तर...''

त्यांचं बोलणं मध्येच तोडत ते मेथड मास्तर म्हणाले, ""अहो, त्याचं उत्तर शंभर टक्के सत्य होतं. मला तो मुलगा चांगला ठाऊक आहे,'' असं म्हणून ते मेथड मास्तर थबकले. बोलावं की बोलू नये असा क्षणभर विचार करून त्यांनी त्या पाठ शिक्षकाच्या पाठीवर हात ठेवला व त्यांना ते म्हणाले, ""गेल्याच वर्षी त्या मुलाची आई कालवश झाली. त्याला आणखी भावंडे आहेत. त्यांची आबाळ होऊ नये, त्यांचं संगोपन व्यवस्थित व्हावे म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी दोनच महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला आहे. त्या विवाहाला हा मुलगा व त्याची इतर भावंडं साहजिकच हजर होती. त्याच्या उत्तरातून उसळलेल्या हशामागे त्याच्या वडिलांचं पत्नी वियोगाचं दुःख लपलेलं होतं. तुमचा पाठ चांगलाच झाला. फक्त बालमानसशास्त्र समजून घेत चला.''

तेव्हा ते पाठ शिक्षक म्हणाले, ""सॉरी सर, पण सहज विचारतो हं. त्या मुलाचे वडील कुठे नोकरी करतात?''

त्यावर ते मेथड मास्तर म्हणाले, ""बघा, पुन्हा तुम्ही अनावश्‍यक प्रश्‍न विचारलात. आता तुम्ही विचारतच आहात म्हणून सांगतो, माझाच मुलगा आहे तो.'' एवढे बोलून पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा टिपत ते दृष्टिआड झाले. सारेच जण स्तब्ध झाले. अचानकपणे तिथे काही क्षण एक भावुक वातावरण निर्माण झाले.

माझे वडील नगरच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र हे विषय शिकवायचे. सुमारे ५५ वर्षांपूर्वी मी दिलेले वरील उत्तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचे...

कथाकार: अद्न्यात
स्त्रोत: विरोप