आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, January 20, 2010

लाला टांगेवाला...

लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

स्त्रोत : इ-पत्र
कवी: अद्न्यात

Tuesday, December 22, 2009

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांची जन्मदाती आई ही जिजाबाईसाहेबांची ओळख.पण त्यांची एव्हढीच ओळख करुन देणे हा त्यांच्यावर अन्याय होईल.देवगिरीचे सम्राट यादवराव हे भगवान श्रीकृष्णाचे वंशज.या यादवरावांच्या घराण्यामधील लखुजीराजे जाधवराव यांच्या खानदानी घराण्यात सन १५९८ मध्ये जिजाबाईसाहेबांचा जन्म सिंदखेडराजा येथे झाला.लखुजीराजे जाधवराव हे त्याकाळी निजामशाह दरबारामधील एक कर्तृत्ववान,मातब्बर सरदार !घरी गजांतलक्ष्मी नांदत होती.अशा ऐश्वर्यसंपन्न घराण्यात जन्मलेल्या जिजाबाईसाहेबांचे लग्न तितक्याच तोलामोलाच्या भोसले घराण्यामधील शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाले.भोसले हे मातब्बर,कर्तबगार,पराक्रमी सरदारहि निजामशहीच्याच पदरी चाकरी करीत होते. एका ऐश्वर्यसंपन्न खानदानी घराण्यातील मुलीने लग्नानंतर दुस~या ऐश्वर्यसंपन्न घराण्यातील खानदानी घराण्यात प्रवेश केला.शहाजीराजांबरोबर लग्न म्हणजे एका कर्तबगार,शुर,धाडसी...प्रसंगी धोका पत्करण्याची तयारी असलेल्या महत्वाकांशी विर पुरुषाला जीवनभर साथ देण्याचे व्रत!पौर्णिमेसारखे सुख,आनंद उपभोगणे व अमावस्येसारखे दुखःही भोगणे !नखशिखांत सौभाग्यलेणी ल्यालेल्या,वज्रचुडे घातलेल्या जिजाऊसाहेबांचे सौभाग्य सदैव पणाला लागलेले !वडील,भाऊ यांचे निजामशहाने भर दरबारामध्ये दगाबाजीने केलेले खून,पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविणे,सख्ख्या जाऊबाईंना मोंगल सुभेदाराने पळवून नेणे,शहाजीराजांचे अपमान हे सर्व त्यांनी भोगले.शहाजीराजांना निजामशाहीच्या नांवाखाली स्वतंत्र राज्य स्थापण्याला यश आले नाही व अदिलशाहाने त्यांना नवीन,मोठी जहागिरी देउन बंगरुळला पाठविले.भरपूर दागिने लेऊन,भरजारी रेशमी वस्त्रे घालुन,चांगले गोडधोड खाउन शहाजीराजांसोबत बंगरुळात ऐश्वर्यात जिवन जगणे त्यांना सहज शक्य होते.पण त्यांचा पिंडच वेगळा होता.महाराष्ट्रामध्ये मुसलमान बादशहांनी हिंदूंवर चालविलेले जुलूम,स्त्रियांवरील अत्याचार यामुळे त्या अस्वस्थ,बेचैन होत्या.रंजल्या गांजल्या सामान्य माणसाला या त्रासामधून सोडविण्यासाठी आपले राज्य,स्वराज्य हवे या विचाराने भारलेल्या जिजाऊसाहेबांनी सुखाने आनंदाने बंगरुळला शहाजीराजांसोबत रहायचे सोडून पुण्याच्या फक्त ३६ खेड्यांच्या जगागिरीमधून "स्वराज्य" निर्माण करण्याचे वेडे व्रत स्वीकारले.

 

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब-2

आदिलशाही सरदारांनी पुणे व आजूबाजजूचा शहाजीराजांच्या जहागिरीचा प्रदेश बेचिराख केला होता.अशा उध्वस्त,उजाड जहागिरीमधून हिंदवी स्वराज्य उभे करण्याचा त्यांनी निश्चय केला.पतीच्या स्वराज्याच्या ध्यासाचे त्यांना सदैव भान होते.पुण्याच्या ३६ खेड्यांच्या उजाड जहागिरीच्या को~ या कागदावर त्यांनी स्वराज्य-मंदिर रेखाटण्यास सुरुवात केली.त्याकेवळ बाल शिवाजीराजांच्याच आऊसाहेब नव्हत्या.....त्यातर अवघ्या मावळातल्या स्वराज्यातल्या सर्व गोरगरीब सामान्य रयतेच्याच माऊली अन सावली झाल्या.रंजल्या-गांजल्या सर्वसामन्य रयतेच्या,साध्या सैनिक-शिलेदारांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी आऊसाहेबांचा आधाराचा हात सदैव सर्वांच्या पाठीवर असायचा.
जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व सतराव्या शतकात पुर्ण हिंदुस्थानामध्ये ठळकपणे उठुन दिसत होते. मुत्सद्दी,धडाडी,कणखरपणा,धैर्य या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अंधा~या आकाशात ठळकपणे तळपण्या~या धृव ता~या प्रमाणे मार्गदर्शक होते.त्यांचे निपक्षपाती न्यायदान,कर्तव्यकठोर स्वभाव,प्रजेबद्दलचे ममत्व,हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा,स्त्रियांच्या बेअब्रुची चिड यासर्वांचा परिणाम बाल शिवाजी राजांच्या जडणघडणीवर फार मोठा आहे.आऊसाहेबांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या नंतरचे चार पुत्र अल्प वयातच मृत्यू पावले.पुढे शंभुराजेहि कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले.आता राहिले एकटे शिवाजी महाराज ! मात्र शिवाजी महाराजांवर आलेल्या अनेक संकटप्रसंगी त्या विचलीत झाल्या नाहीत.अफझलखानाला,आग्रा भेटीला जाण्याचा प्रसंग असो,आऊसाहेबांचा सल्ला असायचा..." सिऊबा बुद्धीने काम करणे,अफझलखानास मारोनी संभाजीचे ऊसने घेणे" "सिऊबा जाणे,राजकरण फते करुन येणे."कर्तव्यकठोर,न्यायनिष्ठू
र,प्रजावात्सल्य,शूर,प्रशासनकुशल अन मुत्सद्दी राजा घडविण्यासाठी जे जे आवश्यक आहे,ते ते त्यांनी केले.म्हणुनच शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना त्यामधून जिजाऊसाहेबांना वगळताच येणार नाही.
"राधा माधव विलास चंपू"या काव्यात्मक ग्रंथामध्ये जयराम पिंडे या समकालीन कवींनी जिजाऊसाहेबांचे वर्णन कसे केले आहे पहा...........
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई !
भली शोभली ज्यास जाया जिजाई !!
जिचे किर्तीचा चंबु जंबुद्विपाला !
करी सावली माऊलीशी मुलाला !!
एके ठिकाणी जयराम पिंडे त्यांचा उल्लेख "योगिनी" असेहि करतात.

 

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब.-3

जिजाबाईसाहेबांच्या कर्तृत्वाचे मुल्यमापन करताना डॉ.बाळकृष्ण म्हणतात......
she had the head of a man over the shoulders of a women.she remained a guide,philosopher and friend to shivaji through out her life.she anxiously watched the rising sun of the glory of her son and was fortunate to witness it's climax in his coronation as an independent king and an ornament of kshatriya race.
(जिजाबाईसाहेबांचे शरीर स्त्रीचे पण डोके(मुत्सद्दीपणा,बुद्धिमत्ता) मात्र पुरुषाचे होते.आपल्या सर्व आयुष्य़ामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक,तत्वज्ञ व ख~या मित्राप्रमाणेच राहिल्या.अतिशय उत्सुकतेने त्यांनी आपल्या मुलाचे सुर्याप्रमाणे दैदिप्यमन्य हिंदवी स्वराज्याचे वैभव पाहिले,आणि क्षत्रिय कुलामधील सार्वभौम सिंहासनाधिष्ठ हिंदू राज्याच्या रुपात आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा माध्यान्हहि पहाण्याचे भाग्य त्यांना त्यांच्या आयुष्यातच लाभले.)
राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसानंतर बुधवार दि.१७/०६/१६७४,जेष्ठ वद्य नवमी शके १५९६ रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचा मृत्यू झाला.महाराजांचा राज्याभिषेक पहाण्यासाठीच जणू त्यांनी आपले पंचप्राण आपल्या वृद्ध,थकलेल्या शरिरामध्ये एकवटले होते अन आपल्या मुलाचा हिंदू नृपति म्हणून सिंहासनाधिष्ठित झालेला पाहून कृतार्थतेने त्यांनी शांतपणे,समाधानाने कैलासाची वाट धरली.त्यांचा मृत्यू नवज्वराने झाला असे शिवदिग्विजय बखरीमध्ये स्पष्ट लिहिले आहे.
जिजाऊमाँसाहेब म्हणजे महाराजांचे सर्वस्वच !त्यांच्या मृत्यूने महाराज अतीव शोकाकुल जहाले.महाराजांच्या शोकाकुल मनःस्थितीचे अतिशय ह्रुद्य वर्णन शिवदिग्विजय बखरीमध्ये उपलब्ध आहे........
"(महाराजांनी)आईसाहेबांचा आज्ञाभंग तिळमात्र केला नाही.......परस्परे एकाग्र अंतःकरणे होती.त्यामुळे क्षणैक वियोग जाला असता मनास चैन पडू नये,जावे,भेटावे असे (महाराज)वागत होते.ते छत्र (मातृछत्र)विच्छिन्न जाल्यामुळे उदासवृत्तीने......बहुतेकांनी नानाप्रकारे रंजने केली,परंतु कधी संतोष पहिल्याप्रमाणे जाला हे घडलेच नाही."
पुण्यशील,योगिनी जिजाबाई आईसाहेबांना लाख लाख प्रणाम .

सुभाष खडकबाण .

स्त्रोत : विरोप

Friday, December 18, 2009

सार्थ हिंदु नृसिंहा...........

सावरकरांची एक कविता आणि तिचा अर्थ...

हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री - सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

=========================

हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा

:- हे हिंदु शक्तिद्वारा उत्पन्न झालेल्या धगधगीत तेजस्वी पुरूषा !

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

:- हे हिंदुंनी अविरत केलेल्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्वराच्या तेजस्वी अंशा !

हे हिंदुश्री - सौभाग्य-भूतिच्या साजा

:- हे हिंदुंच्या लक्ष्मी व सौभाग्य ऐश्वर्याच्या अलंकारा !

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा !

:- हे हिंदुंसाठी कलियुगात अवतार धारण करणार्‍या नरसिंहरूप शिवराया !

(ज्या प्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपू राक्षसाला फाडले त्याच प्रमाणे शिवरायांनी अफजल खान रूपी राक्षसाला फाडले हा एक अर्थ आणि सिंहा समान शूर असणारा राजा म्हणून नरसिंह असाही एक अर्थ)
 
करि हिंदुराष्ट्र हें तूतें ! वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

===================================

करि हिंदुराष्ट्र हें तूतें ! वंदना

:- हे हिंदुराष्ट्र तुजला वंदन करीत आहे.

करि अंतःकरण तुज अभि-नंदना

:- (हे हिंदुराष्ट्र) तुझी अंतःकरणापासून भलावण करीत आहे.


तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना

:-(हे हिंदुराष्ट्र) तुझ्या पावलांना भक्तिभावाने चंदन लेपत आहे.

गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, माझ्या काही अत्यंत गुप्त अशा महत्वाकांक्षा आहेत, त्या तुम्ही पूर्ण करा. त्या गुप्त महत्वाकांक्षा पूर्ण करा, ज्या मी प्रगटपणे (पारतंत्र्यात असल्यामुळे) कथन करू शकत नाही.
 
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदुर्ग आंसवामाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे ! भंगले
जाहली राजधान्यांची ! जंगले
परदास्य-पराभवि सारीं ! मंगले
या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

==========================

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

:- गड कोटांचे तट आज भग्नावस्थेस पोहचलेले आहेत.

हा भग्न आज जयदुर्ग आंसवामाजी

:- एके काळी विजयोत्सव साजरे करणारे दुर्ग आज आश्रू ढांळत आहेत.

ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा

:- एकेकाळी प्रतक्ष भवानी देवी ज्या तरवारींमध्ये संचार करीत होती, त्या तरवारींची पाती आता (अहिंसा व्रताचरणाने) न वापरली गेल्या मुळे गंजून गेलेली आहेत.

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

:-आमच्या शस्त्रांस्त्रांची आम्हीच आशी आबाळ केल्यामुळे, एके काळी
आमच्या शस्त्रांमध्ये वास्तव्य करणारी ही भवानी आज कुणाला आधार देईनाशी झाली आहे.

गड कोट जंजिरे सारे ! भंगले

:-गिरीदुर्ग आणि जलदुर्ग आज पूर्णपणे भंगलेले आहेत. (आमचा इतिहास आम्ही पूर्ण विसरून गेलो आहोत व आमच्या स्फुर्तीस्थानांना आज अवकळा प्राप्त झालेली आहे.)

जाहली राजधान्यांची ! जंगले

:- एके काळी सप्त गंगांच्या साक्षीने जिथे राज्याभिषेक झाले, अशा आमच्या राजधान्यांची आज जंगले झालेली आहेत. (आम्ही एके काळी 'पृथ्वी वल्लभ' होतो हेच मुळात आम्ही विसरून गेलेलो आहोत.)

परदास्य-पराभवि सारीं ! मंगले

:- पारतंत्र्यात जगताण्यात व पराभूत जिणे जगण्यातच आज आम्ही धन्यता मानीत आहोत.

या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, हे असले लाजीरवाणे जीवन कंठावे लागत असल्यामुळे या जगात जगतांना लाज वाटत आहे.
 
जी शुद्धी हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धी पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कुटनीतीत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतुचि कर्मी ! राहु दे
ती बुद्धी भाबड्या जींवा ! लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी ! वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

===============================

जी शुद्धी हृदाची रामदासशिर डुलवी

:- (तुझे) निर्मळ व शुद्ध अंतःकरण असे आहे की जे पाहून प्रत्यक्ष रामदास स्वामींनी अत्यानंदाने मान डोलवली.

जी बुद्धी पांच शाहींस शत्रुच्या झुलवी

:- (तुझी) अफलातुन बुद्धी अशी होती की जीने पांच पातशाह्यांना पराभवाच्या तारेवर झुलवत ठेवले.

जी युक्ति कुटनीतीत खलांसी बुडवी

:- (तुझी) युक्ति कुटनितीत (श्रीकृष्ण व चाणक्याने दाखवून दिलेली निती) इतकी प्रगल्भ होती की जीने कित्येक दुष्ट शत्रुंना रसातळाला पोहोचवले.

जी शक्ति बलोन्मत्तास पदतली तुडवी

:- (तुझी) शक्ति अशी अफाट होती की जीने बळाने उन्मत्त झालेल्या कित्येक राक्षसांना पायदळी चिरडून टाकले.

ती शुद्धी हेतुचि कर्मी ! राहु दे

:-आम्ही आमची कर्मे करीत असताना व हेतू साध्यता करीत असताना, ते तुझ्या सारखे निर्मळ व शुद्ध अंत:करण आमचेही राहू देत. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

ती बुद्धी भाबड्या जींवा ! लाहु दे

:- पांच पातशाह्यांना झुलवत ठेवणारी ती अफाट बुद्धीमत्ता या परम सहिष्णू भाबड्या हिंदुंनाही जरा लाभु देत. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

ती शक्ती शोणितामाजी ! वाहु दे

:-बळाने उन्मत्त झालेल्या राक्षसांना पायतळी तुडवणारी तुझी ती शक्ति आम्हालाही रणांगणात युद्ध करताना अंगात संचारू देत व त्या शक्तीने शत्रुच्या चिंधड्या उडवताना आम्हांस रक्तस्नान घडू देत.

दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, समर्थ रामदास स्वामींनी तुला जो स्वातंत्र्याचा मंत्र दिलेला होता तो तू पुन्हा आमच्यात संक्रमीत कर. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

कवी - स्वातंत्र्यवीर सावरकर
स्त्रोत : विरोप