Wednesday, February 06, 2008

एकटेच शब्द माझे
सोबतीला सूर नाही
दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही

हाच आहे तो किनारा
येथेच होती भेट झाली
अन् संपली जेथे कहाणी
तोही पत्थर दूर नाही

तू जिथे असशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र नांदो
आंधळ्या माझ्या नभाला
चांदण्यांचा नूर नाही

ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांची
पंगतीला या बसावे
मी एव्हढा मजबूर नाही

रात्र त्यांची झिंगलेली
पण आत्मे अस्थिर झाले
शांत आहे झोप माझी
अंतरी काहूर नाही....

पाठ वळता वार करता,
अन् तरी हसता कसे?
वार होता पाय धरने
या दिलाचा दस्तुर नाही...

तू नको पुष्‍पांस वाहू
माझिया थडग्यावरी
थडग्यातला मृद गंध माझा
मी फुलांना आतुर नाही...

त्या तुझ्या नजरेत होता
तारकांचा जो सडा
त्या तारकांनी घात केला
अन् घाव ही अलवार नाही...

मी जरी निष्पराण झालो
आत्मा जागेल हा,
वार्‍यासवे हरवून जाण्या
तो कुणी कापूर नाही...

दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही..

-सौमित्र साळुंखे.

No comments:

Post a Comment