Friday, December 07, 2007

पेटत्या वणव्यातही घरकूल आम्ही थाटतो
चालतो काट्यांत अन वाणे फुलांची वाटतो
वेदनांना घाबरूनी प्रेम का होते कुठे?
दुःख अमुचे पाहुनी गहिवर सुखाला दाटतो....

....

वाटते, येथे जगायाची न अपुली लायकी
काय मैफीलीस या रुचणार अपुली गायकी!
गूढ या मंचावरी अदृष्य पडदे शेकडो
नायकाचे सोंग काढुन वावरे खलनायकी...
....

का अश्या साध्याच गोष्टी कठीण आता जाहल्या
साद प्रतिसादात या भिंती उभ्या का राहिल्या?
संशयाची आरशी चढली कशी डोळ्यांवरी?
भरवश्याच्या राहिल्या ना आपल्याही सावल्या.....
....

कसे सांगू कुणी मधुमास होते फुलविले
कुणी सुखवीत दळ एकेक कळिला खुलविले
अता गंधावरी ज्या भ्रमर येती धावुनी
कुणी श्वासांत अत्तर जीवघेणे शिंपले....
....

श्वास येतो.. श्वास जातो.. चालते हे ह्रदयही
एकट्याने चालण्याची होत जाते सवयही
भेटलो नव्हतोच जेव्हा, काय मी जगलेच नव्हते?
का अता ही शांतता येऊन एकांती भिवविते?
....

खुळ्या नदीचे सारे जीवन
निळ्या सागरी गेले वाहुन
अथांग झाले अवघे जीवन
विराग सुंदर अनुरागाहुन
....

ज्यात गवसली खरी मुक्तता
असे कसे घातलेस बंधन
तुझ्यावरी वाटते रुसावे
आणि स्वतःशी होते भांडण
...

तोच पडतो प्रश्न वारंवार की हे का असे?
सरळमार्गी चालणा-याचे जगी होते हसे
फूल जे जे वेचण्या जावे, निघे ते कागदी
हात जोडावे तिथे पाषाण निर्मम का दिसे?

--स्वाती आंबोळे

2 comments: